मुंबई : ‘राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प शेती, सामाजिक न्याय, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा व ग्रामविकासाला चालना देणारा असून आपण त्याचे स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याच्या विकासाला मिळालेली गती यामुळे कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी व्यक्त केली.
पाटील-दानवे म्हणाले, ‘अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी तीन हजार ४९८ कोटींचा निधी, कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ९०० कोटींचा निधी, सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला साह्य करण्यासाठी ५०० कोटींच्या अनुदानाची तरतूद, सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटीच्या ९६ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी २७० कोटी रुपये अशी अंतरिम अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.’
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये करण्यात आली आहे; तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटींनी वाढविण्यात येणार आहे; तसेच ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी दोन हजार ८९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीजपुरवठा, मेट्रो, घरबांधणी अशा विविध क्षेत्रांसाठी या अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.